पद्मश्री पुरस्कार माझ्या काळ्या आईचा, बीयांचा आणि समाजाचा - राहीबाई पोपरे

राळेगणसिद्धी ​​​। संघर्षनामा न्युज 

लिंपणगाव (प्रतिनिधी) - पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, माझ्या बीयांचा, निसर्गाचा आणि आपल्या समाजाचा आहे. मागील २५ वर्षांपासून देशी बीया घरी जतन करत असल्याचे त्या म्हणाल्या. याबाबतची माहिती जगाला व्हावी म्हणून बायफ संस्थेची मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. गावपातळीवर कळसुबाई समिती स्थापन झाली असून सध्या संस्थेच्या सहाय्याने ३ हजार महिलांसोबत हे काम सुरू आहे. ज्या प्रकारे गावरान बीज बँक अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे अशाचप्रकारे गावोगावी अशा बीज बँका निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केली.

राळेगणसिद्धी येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्यस्तरीय पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, ‘ वी सिटीझन्स’चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे आदी उपस्थित होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या भोजनानंतर समारोप समारंभात प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी ‘सौरऊर्जा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात स्वच्छ भारत मिशनच्या प्रभाकर तावरे यांचे ‘प्लास्टिक निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन’, अमेरिकतील पर्यावरण अभ्यासक संगीता तोडमल यांचे ऑनलाईन पद्धतीने ‘पर्यावरणाचे वेगळेपण’ या विषयावरील सत्र संपन्न झाले.

रासायनिक खाते, फवारणी, कीटकनाशक यांच्यामुळे उत्पादन तर नक्कीच वाढले आहे. मात्र, आपण अन्नात विष तयार करायला लागलो आहोत. तसेच आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या खराब झाल्यात की, त्यामुळेच निम्म्याहून अधिक आजार आपल्याला होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व आपल्याला कळायला हवे. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे राहीबाई पोपरे यांनी सांगितले.

समारोप समारंभात, राज्यभरातून आलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींना राहीबाई यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन धीरज वाटेकर तर आभार प्रमोद काकडे यांनी मानले. संमेलनाच्या उद्घाटन समारंभात श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत धिवरे यांनी पुढील पर्यावरण संमेलन शिर्डी येथे घेण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी संस्थान सर्वतोपरी सहकार्य करेल असेही त्यांनी ग्वाही दिली.
स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरेगाव स्मशानभूमीत करण्यात आलेल्या ६७ वृक्षरोपणामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले.  फाउंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, वनश्री पुरस्कृत बाळासाहेब जठार यांनी याकामी योगदान दिले.

Related Post