तत्त्वनिष्ठ नेता हरपला, अवघा महाराष्ट्र हळहळला…

संघर्षनामा वृत्तसेवा ।श्रीगोंदा

दि . २९ जानेवारी २०२६

संपादकीय,

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस काळ्या अक्षरांनी नोंदवला जाईल.

हजरजबाबी, कणखर, निर्णयक्षम आणि तत्वनिष्ठ नेतृत्वाचा एक खंदा आधारस्तंभ कोसळला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अचानक जाणे हे केवळ एका व्यक्तीचे निधन नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संपूर्ण युग संपण्यासारखे आहे.

विमान दुर्घटनेत काळाने साधलेला हा डाव इतका अनपेक्षित होता की, क्षणात संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. राजकीय मतभेद, वैचारिक दरी, पक्षीय भिंती या सर्व पुसून टाकत तळागाळातील शेतकरी, कामगार, कार्यकर्ता, अधिकारी, पत्रकार ते सामान्य नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले—हा क्षण महाराष्ट्राने यापूर्वी क्वचितच पाहिला आहे.

अजितदादा म्हणजे राजकारणातला थेटपणा.

बोलण्यात कडवटपणा, शब्दांत धार, पण निर्णयांमध्ये समाजाचा, राज्याचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार. ते गोड बोलून फसवणारे नव्हते, तर कडू सत्य सांगून मार्ग दाखवणारे नेते होते. त्यामुळेच ते कधी वादग्रस्त वाटले, पण कधीही दुर्लक्षित राहिले नाहीत.

राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी प्रशासनाची नाडी ओळखली होती. सत्ता म्हणजे केवळ पद नव्हे, तर जबाबदारी असते, हे त्यांनी प्रत्येक निर्णयातून दाखवून दिले. विविध खात्यांची धुरा सांभाळताना त्यांनी आर्थिक शिस्त, निर्णयक्षमता आणि वेळेचे भान या तीन गोष्टी कधीही ढळू दिल्या नाहीत.

बारामतीचा विकास हा अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा आत्मा होता.

एका मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास करताना त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, उद्योग -या सर्व क्षेत्रांमध्ये बारामतीने घेतलेली झेप ही विकास कसा करावा . याचा वस्तुपाठ होती. आणि हाच मॉडेल संपूर्ण राज्यात राबवण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.

अजितदादा हे केवळ नेते घडवणारे नव्हते, तर नेतृत्व निर्माण करणारे शिल्पकार होते.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार, मंत्री बनवण्याची क्षमता फार थोड्या नेत्यांकडे असते. कार्यकर्त्यांवर विश्वास टाकणे, त्यांना संधी देणे आणि जबाबदारी पेलायला शिकवणे—यामुळेच त्यांना आमदारांची फॅक्टरी असे संबोधले गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक चेहरे घडले, जे आज राज्याच्या राजकारणात ठळकपणे दिसतात.

राज्याच्या अर्थव्यवस्थेत समतोल राखत ग्रामविकास साधण्याची त्यांची दृष्टी विलक्षण होती.

शहरांचा विकास गरजेचा आहेच, पण ग्रामीण महाराष्ट्र मजबूत झाल्याशिवाय राज्य प्रगती करू शकत नाही, हा त्यांचा ठाम विचार होता. सिंचन, शेती, पाणीवाटप, रोजगारनिर्मिती यासारख्या विषयांवर त्यांची पकड आणि निर्णयक्षमता आजही मार्गदर्शक ठरू शकते.

पत्रकारांशी अजितदादांचे नाते वेगळेच होते.

ते प्रश्नांना घाबरत नव्हते. थेट प्रश्न, थेट उत्तर ही त्यांची शैली होती. कधी शब्द कठोर असायचे, पण त्यामागे मनातील प्रामाणिकपणा असायचा. म्हणूनच पत्रकारांना ते कधी रागीट वाटले, तरीही ते नेहमीच हवाहवासा वाटणारा नेता राहिले.

घड्याळाच्या काट्यावर निर्णय घेणारा नेता अशी त्यांची ओळख होती. वेळेचा अपव्यय, अनावश्यक चर्चा किंवा फाईल्स अडकवून ठेवणे—या गोष्टी त्यांच्या कार्यपद्धतीत नव्हत्या. निर्णय आवडो वा न आवडो, पण निर्णय ठाम आणि वेळेत असायचा. म्हणूनच प्रशासनात त्यांचा दबदबा होता.

                             चौकट

सत्यवादी, विषयाला समतोल देणारा, राजकारणाचा सातबारा अचूक वाचणारा हा नेता आज आपल्यातून गेला आहे. त्यांचे निर्णय, त्यांची शैली, त्यांची कार्यपद्धती यावर चर्चा होत राहील; पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही, हे मात्र नक्की.

आज अजितदादा आपल्यात नाहीत…

पण त्यांनी घडवलेले कार्यकर्ते, उभे केलेली विकासाची पायाभरणी आणि निर्णयांची छाप महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अढळ राहील.

अलविदा अजितदादा…

तुमचे शब्द कडू होते,

पण हेतू स्वच्छ होता.

तुमचे निर्णय कठोर होते,

पण त्यामागे राज्यहित होते.

महाराष्ट्र तुमचे ऋण कधीही विसरणार नाही. ?

Related Post