फाउंडेशनच्या ध्यान महोत्सवाची उत्साहात सांगता.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.३ डिसेंबर २०२४

प्रतिनिधी,

हॅपी थॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त श्रीगोंदा येथे रत्नकमल मंगल कार्यालय येथे रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सतिष बोरा, सामाजिक कार्यकर्ते, मा. डॉ. जे. एम. शिर्के, विभाग प्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकिय महाविद्यालय पुणे, मा. डॉ. उर्मिला शिर्के, विभाग प्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकिय महाविद्यालय पुणे व मा. श्री सुनिल मिसाळ, विस्तार अधिकारी यांच्या शुभ हस्ते पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या मा. श्री सुनिल मिसाळ यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली. त्यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे, असे समजावले, जीवनात स्वल्पविराम घेण्याचे महत्व पटवून देत, हातातील गोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, स्व अनुभव होईल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे मी कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. मी कोण आहे? हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना स्व-अनुभव मिळाला.

या कार्यक्रमाला २१५ पेक्षा जास्त साधक आणि नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी मनोभावे कार्यक्रमाचा आनंद घेतला. मा. डॉ. जे. एम. शिर्के व मा. डॉ. उर्मिला शिर्के यांनी आपल्या

विचारांतून उपस्थितांना संबोधित केले आणि साधनेसाठी प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुचित्रा अजित रणदिवे यांनी रंगतदार पद्धतीने केले आणि फाउंडेशनच्या २५ वर्षांच्या प्रवासाची ओळख श्रोत्यांना करून दिली.

कार्यक्रमाच्या समारोपात, जवळपास सर्व उपस्थितांनी २१ दिवसांचे ध्यान चॅलेंज घेण्याचा संकल्प व्यक्त केला. याचबरोबर, तेजज्ञान फाउंडेशनतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम भारतातील सुमारे १२५ शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशभर ध्यानाच्या माध्यमातून शांतता आणि आनंदाचे सशक्त वातावरण निर्माण होत आहे.

Related Post