संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१३ सप्टेंबर २०२५
प्रतिनिधी,
अहिल्यानगर :- पंढरपूर पायी दिंडी वारीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र या निधीच्या खर्चात प्रचंड गैरव्यवहार, अपहार आणि भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यामध्ये ज्यांच्याकडून चौकशी व कारवाई होणे अपेक्षित आहे त्यांच्याच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
संभाजी ब्रिगेडने या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले असून येत्या सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना भेटून अधिकृतरित्या तक्रार व सर्व पुरावे सादर करण्यात येणार आहेत. या संदर्भात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच गुन्हे दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही खटले चालविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.
संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका
शासनाचा निधी हा जनतेच्या करातून जमा होतो. तो पैसा समाजहितासाठी वापरला जाण्याऐवजी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात गेला, तर जनता कधीच गप्प बसणार नाही. पायी दिंडी वारी ही भक्तीची, परंपरेची व श्रद्धेची वाटचाल आहे. त्या पवित्रतेवर भ्रष्टाचाराचा डाग लावणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे.
सोमवारी जिल्हा परिषदेला भेट दिल्यानंतर पुढील लढ्याची दिशा जाहीर करण्यात येईल-संभाजी ब्रिगेड