कुकडीचे पाणी विसापूर धरणात सोडण्यात यावे-राजेंद्र नागवडे

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.१०जून २०२४

लिंपणगाव प्रतिनीधी,

श्रीगोंदा तालुक्यात तसेच कुकडी लाभक्षेत्रात कमी अधिक प्रमाणांत परंतु बऱ्यापैकी पाऊस झाला असल्यामुळे सध्या कुकडी डाव्या कालव्याचे पिण्याकरीता चालू असलेल्या आवर्तनामधुन विसापुर धरणात पाणी सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचेकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी केली आहे.


मागील काही दिवसांपुर्वी श्रीगोंदा तालुक्यात व विशेषतः कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे कुकडी डाव्या कालव्यातुन पिण्याकरीता पाणी सोडणेसाठी मागणी करणेत आली होती व त्यानुसार पाण्याचे उद्भव भरुन घेणेकरीता पाणी सोडणेत आलेले आहे. परंतु सध्या श्रीगोंदा तालुक्यात तसेच कुकडी कालवा लाभक्षेत्रात असणाऱ्या कर्जत, करमाळा, जामखेड या भागातही कमी अधिक प्रमाणांत परंतु बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. शिवाय मान्सुनचे आगमन होत असल्यामुळे चांगल्याप्रकारे पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या कुकडी डाव्या कालव्यातून सोडलेल्या पिण्याचे पाण्याचे आवर्तनामधुन श्रीगोंदा तालुक्यात साठवण तलाव भरुन घेण्यात यावेत व त्याचबरोबर विसापूर धरणात पाणी सोडून ते भरुन घेतले तर त्याचा लाभ कुकडी व विसापुर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तसेच विसापूर धरणावर परिसरातील अवलंबून असणाऱ्या घोसपुरी सारख्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना होणार असल्याने विसापुर धरणांत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राजेंद्रदादा नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना सोमवार दि. १० रोजी समक्ष भेटून केली आहे.

Related Post