संघर्षनामा वृत्तसेवा। श्रीगोंदा
दि.27 जाने. 2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) मुख्याध्यापक राजेंद्र हिरवे यांनी शिक्षण संस्थेत सेवा कालावधीत उत्कृष्ट ज्ञानदान करून संस्था व विद्यालयाचा नावलौकिक वाढवला. आपल्या प्रदीर्घ सेवेत शालेय विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षणाचे धडे दिले असे गौरवोद्गार सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र हिरवे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने श्री व सौ हिरवे यांचा साप्तनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते.
यावेळी व्यासपीठावर मा. पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे; भाऊसाहेब बरकडे; राजेंद्र म्हस्के; सरपंच सुरेखा हिरवे; सावता हिरवे; संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड; शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे; सरपंच सुरेखा हिरवे; उपसरपंच सारिका दानवे; कोळगावचे सरपंच भैय्या लगड; नितीन नलगे; एकनाथ बारगुजे; दीपक तारकुंडे; बाळासाहेब जगताप; शिवाजीराव जगताप; शिवदास शिंदे; यांच्यासह श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सर्व आजी माजी मुख्याध्यापक; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी; विद्यार्थी; ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मा सभापती शहाजी हिरवे; ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र मडके; ह भ प; नारायण झेंडे; विद्यार्थी प्रतिनिधी समीक्षा आल्हाट आदींनी मुख्याध्यापक हिरवे यांच्या कार्यकर्तृत्वावर स्तुतीसुमने वाहिली.
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते अशोकराव देशमुख यांचे हसत खेळत तणाव मुक्ती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान प्रसंगी देशमुख यांनी प्रबोधन करताना म्हटले आहे; प्रत्येकाने घरातील एकत्रित कुटुंबात आनंदी वातावरण ठेवावे; मनमोकळेपणा ठेवावा; अबोला नसावा; सुखी व्हायचे असेल तर दुःखात सहभागी व्हा; आत्ताची पिढी आळशी झालेली दिसून येत आहे. मुलांनी कष्टाची सवय ठेवावी; आजच्या स्थितीला मोबाईलच्या जास्त वापरामुळे तरुण पिढी बिघडली जात आहे; सुखी व्हायचे असेल तर मित्र जोडा; कल्पकतेने पैसे कमवा; दानशूरपणा ठेवावा; सेवानिवृत्तीनंतर तीर्थ क्षेत्राला जावे; व्यसनापासून दूर राहावे; अशा मौलिक सूचना देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक राजेंद्र यावेळी म्हणाले की शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंच्या कृपाशीर्वादाने शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली नोकरी करत असताना आपण कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांवर अधिक प्रेम ठेवले. उद्याची उत्तम भावी पिढी घडविण्यासाठी प्रामाणिकपणे ज्ञानदान केल्याचे हिरवे यांनी सांगून सन्मान केल्याबद्दल शिक्षण संस्था व विद्यालयाचे आभार मानले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की; सहकार महर्षी बापूंनी ग्रामीण भागातील मुलांच्या ज्ञानात वाढ व्हावी उत्तम संस्कार घडावेत म्हणून खेडोपाडी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केली. त्यामुळे अनेक गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाबरोबर नोकऱ्या देखील मिळाल्या. त्याचे उत्तम उदाहरण राजेंद्र हिरवे सर हे आहेत. शिक्षण संस्थेत नोकरी करताना हिरवे यांनी अतिशय कष्टमय जीवनातून प्रामाणिक ज्ञानदान केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाला दिशा मिळाली. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की; शालेय शिक्षण घेताना आई-वडिलांपेक्षाही शिक्षक हे जबाबदारीने विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. जीवनात कोणताही प्रसंग आला तर प्रथम शिक्षकाची आठवण येते. अलीकडे शिक्षण पद्धत बदलताना दिसते. त्यामध्ये तरुण पिढी मोबाईलच्या युगामध्ये गुंतल्याने विद्यार्थी जीवनावर मोठा दुष्परिणाम होताना दिसून येत आहे. सततच्या मोबाईल वापरामुळे जीवनाची दिशा अत्यंत बिकट होणार आहे. तेव्हा मोबाईल पासून दूर राहावे; असे सांगून राजेंद्र हिरवे यांना सेवानिवृत्तीनंतरचे पुढील दीर्घायुष्यासाठी श्री नागवडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रस्ताविक ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र मडके यांनी केले. सूत्रसंचालन माध्यमिक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अशोकराव आळेकर यांनी केले. आभार पर्यवेक्षक नवनाथ पवार यांनी मानले.