संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१९जाने.२०२५
प्रतिनिधी,
अहिल्यानगर दि. १९ - जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरामध्ये ग्रामीण विकासाला नवी चालना देण्याच्यादृष्टीने स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. आपल्या राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१९ मध्ये या योजनेची अंमलबजावणी करत २३ लक्ष ३३ हजार मिळकतपत्रिकांचे वाटप केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून आपले राज्य देशाला दिशादर्शक ठरले असल्याने याचा सार्थ अभिमान असल्याचे ते यावेळी म्हणाले.
स्वामित्व योजनेतून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे एक महत्वाचे पाऊस आज या निमित्ताने टाकण्यात आले असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यात ८१ ठिकाणी ६०४ गावांतून ५७ हजार ७३१ मिळकतपत्रिकांचे वाटप या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. योजनेतून शहरी विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास साधण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये अनेकवेळा घरगुती तसेच शेती जमीनीचे वाद होताना दिसतात. परंतू स्वामित्व योजनेतून ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व्हेमुळे हे वाद संपुष्टात येऊन नागरिकांना त्यांच्या मिळकतीचा दाखला अत्यंत सहज व सुलभपणे मिळणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीवर आधारित देशाच्या विकासाचे नवीन पर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झाले आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला या योजनेतून अधिक गतीने चालना मिळून प्रत्येक नागरिकाला त्यांचा अधिकार प्राप्त होणार आहे. योजनेतून गावाच्या विकासाबरोबरच नागरिकांचा विकासही अत्यंत वेगाने होणार असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अविनाश मिसाळ यांनी स्वामित्व योजनेची माहिती विषद केली.
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना मिळकतपत्रिकांचे, महाज्योती संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅबचे वितरणही करण्यात आले.उपस्थितांना स्वच्छतेची व नशामुक्तीची शपथही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह मालमत्ताधारक उपस्थित होते.